नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कडवंची शिवारात महिला मजूर महामार्गावर काम करत होत्या. याच वेळी नागपूरच्या दिशेकडून मुंबईकडे अत्यंत वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने या महिलांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की काही महिला ट्रकखाली चिरडल्या गेल्या. अपघाताचे दृश्य इतके भयानक होते की उपस्थितांच्या अंगावर काटा आला.
अपघातस्थळी लेकरांचा हृदयद्रावक आक्रोश
अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी आणि मुलांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या आईचा मृतदेह पाहून मुलांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संतापही व्यक्त केला जात आहे.
प्रशासन आणि पोलिसांकडून मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
समृद्धी महामार्गावर मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. दोन वर्षांपूर्वी, २९ जून २०२४ रोजीदेखील अशाच एका भीषण अपघातात सहा जणांचा बळी गेला होता. महामार्गावर काम सुरू असताना मजुरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातात का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.




0 टिप्पण्या